नागपुरात आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा प्रस्ताव
अपघातांची संख्या कमीत कमी व्हावी
मिहानला अधिक गती मिळायला हवी
विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. 1995 मध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर राज्यातील रस्त्यांची स्थिती सुधारली. हे सर्वजन मान्य करतात. लोकसभेत ते नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात व केंद्रातील एक प्रमुख मंत्री म्हणून त्यांनी विदर्भाच्या व प्रामुख्याने नागपूरच्या विकासाचा नवा आराखडा तयार केला आहे. येत्या 3 वर्षात हा आराखडा मूर्त रुपात दिसणार आहे. या संदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न- केंद्रातील आपल्या कारकिर्दीला 2 वर्षे पूर्ण होत आहेत. विकासाच्या कोणत्या योजना आल्या?
गडकरी-
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर लोकांच्या अनेक
अपेक्षा आहेत. अपेक्षांची पूर्तता करणे नेहमीच कठीण गोष्ट असते. हे मान्य केले तरी
लोकाभिमुख अनेक निर्णय झाल्याने लोकांमध्ये समाधान आहे. काहीतरी वेगळे होत आहे.
याची जाणिव लोकांना आहे. जन-धन योजना असो, पंतप्रधान विमा योजना असो, मेक इन
इंडीया, स्टार्ट अप अशा योजनांमुळे लोकांमध्ये निश्चितपणे एक समाधान आहे.
विकासाच्या दिशेने आपण जात आहोत.
प्रश्न- नागपूर हे एक मोठे खेडे अशी प्रतिमा होती. ही आता बदलली आहे. तरीही अनेक प्रश्न अद्यापही आहेत. आपण नागपूरचे खासदारही आहात. नागपूरसाठी काय योजना आहेत?
गडकरी- हे बघा, विकास ही निरंतर चालणारी
प्रक्रिया आहे. शहराचा संपूर्ण विकास झाला, अशी स्थिती कधीच येऊ शकत नाही. तरीही
किमान सुविधा मिळाल्या पाहिजे, अशी माझी धारणा आहे. नागपूर शहर अपघात मुक्त व्हावे,
अशी माझे स्वप्न आहे. यासाठी काही अपघातप्रवण चौक शोधून काढले आहेत. लोकांनीही
याकामी मदत करावी. आपल्या भागातील अपघातप्रवण चौक किंवा रस्ते सांगावे. या चौकांचा
विकास करायचा आहे व या भागातील वाहतूक कशी सुरळीत होईल, याचा अभ्यास करून उपाययोजना
केल्या जाणार आहे.
प्रश्न-नागपुरात अद्यापही पाण्याची समस्या आहे.
गडकरी-
एक गोष्ट तुम्हाला सांगतो. नागपुरात पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. पाणी भरपूर व
पुरेसे आहे. पाण्याच्या वितरणात काही त्रुटी राहू शकतात. नागपूरकरांना चोवीस पाणी
देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.
काही वर्षांपूर्वी चोवीस तास पाण्याची योजना काही भागात राबविली. त्यावेळीही
अनेकांनी विरोध केला होता. परंतु आता ही योजना यशस्वीपणे सुरू आहे. अनेक शहरातील
लोकांनी या योजनेचे कौतुक केले. संपूर्ण शहराला चोवीस तास पाणी देण्याचा माझा
प्रयत्न राहील. अनधिकृत वस्त्यांचा प्रश्न राहील. कारण त्या भागात किचकट
कायद्यामुळे विकासाची कामे करणे काहीसे कठीण आहे. प्रश्न- नागपुरात अनेक शैक्षणिक संस्था येत आहेत. आयआयएम, एम्स, लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे. या क्षेत्रात पुढे काय?
गडकरी- आयआयएम, एम्स, लॉ युनिव्हर्सिटीचा फायदा केवळ
नागपूरलाच नव्हे तर विदर्भातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आता नागपुरात
आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. जवळपास 100 एकरामध्ये
हे विद्यापीठ राहील. अजूनही विदर्भातील युवकांना दर्जेदार शिक्षणासाठी पुणे किंवा
बंगलुरू येथे जावे लागते. हे प्रत्येक कुटुंबाच्या आवाक्यात नसते. विद्यार्थ्यांना
त्या ठिकाणी पाठविणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. यातून मार्ग काढण्यासाठी
नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ साकार करण्याचे स्वप्न आहे. वाठोडा भागात
हे विद्यापीठ उभे राहील. भारतातील व जगातील प्रसिद्ध विद्यापीठाच्या व्यवस्थापनाशी
चर्चा सुरू आहे. पुण्यात सिम्बॉयसीस सारखी संस्था आहे. त्या दर्जाची संस्था
नागपुरातही व्हावी, असे मला वाटते.
प्रश्न- नागपुरात मेट्रो रेल्वे केव्हापर्यंत धावेल?
गडकरी- मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले आहे. वर्धा रोडवर
पिलर उभे केले आहे. मेट्रो रेल्वे तयार करण्यासाठी जो कालावधी निश्चित केलेला आहे.
त्यानुसार मेट्रोचे काम पूर्ण होईल. आता तर मेट्रोचे क्षेत्र वाढविण्यासाठी मागणी
येत आहे. त्यामुळे हिंगणा, कामठी, बुटीबोरी ही शहरे मेट्रोशी जोडण्याची योजना आहे.
भविष्यातील नागपूर शहराचा विकास गृहीत धरून मेट्रोचे जाळे विस्तारले जाण्याची गरज
आहे.
प्रश्न- नागपूर शहर व प्रामुख्याने विदर्भाच्या विकासाचे प्रकल्प केव्हापर्यंत पूर्ण होईल?
गडकरी- हे बघ, मला खोटे बोलायची सवय नाही. ज्या योजना
पूर्ण होतील, त्याचीच घोषणा मी करतो व त्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबवितो. राज्य
सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून या संपूर्ण योजना निश्चितपणे पूर्ण होतील व
येत्या 3 वर्षात हा बदल लोकांना दिसेल.



0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा